चिपळूण प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून शासनाचे दाखले देण्यासाठी असलेले सर्व्हर डाऊन झाले आहे. त्यामुळे सेतू कार्यालयासह महा ई सेवा केंद्रांमधून तयार झालेले हजारो दाखले सध्या अधिकार्यांच्या सह्यांच्या प्रतीक्षेत आहेत. ८ जूनपासून अशी परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे पुढील प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. यामुळे होणार्या शैक्षणिक नुकसानीचा विचार करता ऑफलाईन दाखले देण्याची मागणी होत आहे.
दहावी, बारावी इयत्तेचे निकाल जाहीर झाल्याने पुढील महाविद्यालीन तसेच इतर क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारे उत्पन्न, अधिवास, जात, नॉनक्रिमिलेअर, डोंगरी, शेतकरी आदीप्रकारचे दाखले काढण्यासाठी येथील सेतू कार्यालयासह महाईसेवा केंद्रांमध्ये विद्यार्थी व पालकांची गर्दी होत आहे. सेतूसह महा ई सेवा केंद्रातील कर्मचारी त्या त्या दिवसांचे दाखले त्याच दिवशी कसे तयार होतील यासाठी प्रयत्न करीत आहेत.