राष्ट्रीय महामार्गाच्या  कामासाठी निकृष्ठ वाळूचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार - शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी घेतला आक्षेप

 


देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर) 


     तब्बल तीन वर्षे साठवून ठेवलेली आणि पूर्णपणे माती मिश्रित  वाळूचा उपयोग मुंबई गोवा महामार्ग कामासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी उघडकीस आणला असून तसे लेखी पत्र त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना देऊन आशा निकृष्ठ वाळूचा वापर तात्काळ थांबवून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.अन्यथा वेगळी भूमिका घ्यावी लागेल असेही त्यांनी ठणकावले आहे.
     चिपळूण जवळ कामथे येथे तीन वर्षांपासून वाळूचा प्रचंड साठा करून ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी वाळूचे ढीग दिसून येत आहेत. मात्र या वाळूत आता झाडीझुडपे तयार झाली असून वाळूमध्ये मातीचे मिश्रण झाले आहे. प्रचंड पावसामुळे वाळू वाहून जाऊन त्यामध्ये महार्गावरील धूळ, माती बसली आहे.अशा परिस्थितीत ही वाळू निकृष्ट झाली असून ती वापरण्यास योग्य राहिलेली नाही.असे शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांचे म्हणणे आहे.


         
         परंतु तीच वाळू महामार्ग कामासाठी वापरली जात आहे. महामार्ग चौपदरीकरण कामाची पूर्वीची ठेकेदार कंपनी आणि आता नवीन ठेकेदार कंपनी त्याच निकृष्ट वाळूचा वापर करत असून ही शुद्ध फसवणूक आहे. तसेच या निकृष्ट वाळूमुळे होणारे काम देखील तेवढेच निकृष्ट होणार असल्यामुळे साठवण केलेला निकृष्ट वाळूचा वापर तात्काळ बंद करावा आणि संबंधितावर कारवाई करावी असे पत्र संदीप सावंत यांनी उपविभागीय अधिकारी चिपळूण यांना दिले आहे. तसेच जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग कार्यालय यांना देखील पत्र देऊन विनंती केली आहे.
       जर त्या वाळूचा वापर थांबला नाही.आणि संबंधितावर कारवाई झाली नाही तर मग वेगळी भूमिका घ्यावी लागेल. असेही संदीप सावंत यांनी स्पष्ट केले आहे.