आम आदमी पक्षाने ठाणे महापालिकेची व नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर औरंगाबाद या महापालिकांच्या निवडणुका पूर्ण क्षमतेने लढविण्याचा केला विचार

कल्याण /लोकनिर्माण (सॊ. राजश्री फुलपगार)


 


    आम आदमी पक्षाने ठाणे महापालिकेची व नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर औरंगाबाद या महापालिकांच्या निवडणुका पूर्ण क्षमतेने लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी शनिवारी मुंब्रा मध्ये पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. महापालिका निवडणुका पूर्ण क्षमतेने लढण्यासाठी ठाणे जिल्ह्यात संघटना अधिक मजबूत करणार असल्याचे शिंदे म्हणाले. सध्या काही ठिकाणी उमेदवार निवड प्रक्रिया सुरु झाली असून समान विचार असलेल्या पक्ष संघटने सोबत आघाडी करण्याचे संकेत शिंदे यांनी दिले.


       शिंदे म्हणाले, मुंब्रा कौसा मध्ये सध्या सत्ताधाऱ्यांकडून भीतीचे वातावरण तयार केले जात आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून तडीपार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही अशा प्रकरणांमध्ये आवाज उठवणाऱ्यांसोबत आहोत. हा सत्तेचा दुरुपयोग असल्याची टीका त्यांनी केली. मुंब्रा कौसा कळवा या भागातील समस्या सोडवण्यासाठी पक्ष रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल. राबोडी मध्ये झालेल्या जमील शेख हत्येप्रकरणी आरोपींना अटक करुन कठोर कारवाई करावी, शेख कुटुंबियांना  न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली. टोरन्ट पॉवर विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. मुंब्रा कौसा मध्ये भारतीय संविधान व महात्मा गांधींचे नाव घेऊन हिटलर प्रमाणे काम केले जात असल्याची टीका त्यांनी केली. अशा प्रवृत्तींचा त्यांनी निषेध केला.


पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ अल्तमश फैजी म्हणाले, भीतीच्या वातावरणाविरोधात आप प्रखरपणे आवाज उठवेल. व्यवस्थेविरोधात आवाज उठवणाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत चुकीचे आहे. पोलिसांनी आपली जबाबदारी योग्य पणे निभावावी असा सल्ला त्यांनी दिला. निवडणूकीला वर्षभराचा कालावधी असल्याने भविष्यात इतरांना देखील असाच प्रयत्न करण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. मुंब्रा कौसा मध्ये बदल आवश्यक असल्याने आम्हाला संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले. टोरन्ट कडून वीज बिल प्रकरणी होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. ग्राहकांचे मीटर कनेक्शन कापल्यास संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले. ग्राहकांनी चुकीचे बिल भरु नये,
टोरन्ट मीटर लावून घेऊ नये असे आवाहन फैजी यांनी केले. 
यावेळी पक्षाचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष ऍड विजय पंजवानी,ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश सलुजा, अनिल सिंह, नाझिम अन्सारी उपस्थित होते.