कोयनेत धरणग्रस्तांनी केली होळी , शासनाच्या नावाने शिमगा करून केला निषेध.

 . 

पाटण / लोकनिर्माण प्रतिनिधी  

कोयनानगर ता. पाटण येथे डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी गेले आठ दिवसापासून प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच असून शासनानं या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे  काल होळीच्या सणानिमित्त धरणग्रस्त बायाबापड्यांनी आंदोलन स्थळी होळी पेटवून  शासनाच्या नावाने शिमगा करून निषेध व्यक्त केला. 



कोयनानगर येथे प्रकल्पग्रस्तांचे विविध मागण्यांवर श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठवड्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे, मात्र मुख्यमंत्री, पालकमंत्री जिल्ह्याचे सुपुत्र असुन सुद्धा त्यांना धरणग्रस्तांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वेळ मिळत नाही, पालकमंत्र्यां कडून आम्हा धरणग्रस्तांची चेष्टा केली जात आहे , हे जनतेचे सरकार आहे हे नेहमी म्हणणारे कोयनेचे सुपूत्र असलेले मुख्यमंत्री धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर गंभीर दिसत नाहीत, इतर विषयांबाबत बैठकीसाठी वेळ आहे, मात्र प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सरकार स्थापनेपासून गेले आठ महिने त्यांना वेळ मिळाला नाही, यामुळे त्यांच्या दिरंगाई मुळे आज आम्हा धरणग्रस्तांना गेल्या आठ दिवसांपासून उन वारा, थंडीची तमा न बाळगता घरादाराची पर्वा न करता याठिकाणी आंदोलनास बसावे लागले ,येणारे सणवारही आंदोलनस्थळी साजरे करावे लागत आहेत ,असा आंदोलक धरणग्रस्तांनी आरोप करून  आज सोमवारी आंदोलनाच्या आठव्या दिवशी होळी आंदोलन साजरी करून प्रकल्पग्रस्त  आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या दिरंगाईच्या विरोधात जोरदार घोषणा, बोंबा देऊन होळी साजरी केली. प्रकल्पग्रस्तांनी राज्याच्या विकासासाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेऊन सर्वस्वाचा त्याग केला. त्यांच्या घरी होळीचा सण साजरा न होता आंदोलनस्थळी होळी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा लागला . तरी शासनाला सुबुध्दी येवो व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न मार्गी लागोत.

यावेळी कोयना धरण ग्रस्त व अभयारण्य ग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन मार्गी लागले  पाहिजेत, धरणग्रस्तांना उद्वस्त करणारा शासन निर्णय दुरूस्त झाले पाहिजेत. शंभर टक्के विकसनशील पुर्नवसन झाले पाहिजे अशा मागण्या करण्यात आल्या. 

आंदोलकांनी परंपरागत होळी सण आंदोलनस्थळी साजरा केला, यावेळी कोयना, वांग मराठवाडी, उरमोडी, तारळी प्रकल्पग्रस्त जनता हजारोंच्या संख्येने होळी आंदोलनात सहभागी झाली. 


 "होळीका जशी जाळली तसे आम्ही जळणार नाही"-

 शासनाने आमचा सहनशीलतेचा अंत पाहू नये येत्या 15 मार्चच्या आत आंदोलन कर्त्यांची बैठक घ्या, अन्यथा बळीराजाला जसे फसवून मारले होलिकाला जसे फसवून मारले तसं आम्ही फसणार नाही--कमल कदम - धरणग्रस्त