लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत व पंचक्रोशीमध्ये आठ दिवस पाणीपुरवठा खंडित, शेकडो कारखान्यांचे करोडो रुपयांचे नुकसान. उद्योजकांचा आंदोलनाचा इशारा

 


चिपळूण लोकनिर्माण टीम 

'लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत गेले आठ दिवस पाणीपुरवठा खंडित झाला असून वसाहतीमधील शेकडो कारखाने बंद आहेत. परिणामी कारखानदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत आम्ही एमआयडीसी कडे नुकसान भरपाईची मागणी करणार असून वेळ पडल्यास आंदोलन ही करण्यास तयार आहोत,' असा इशारा लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट श्री. राज आंब्रे यांनी उद्योग भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला.

        याबाबत एडवोकेट राज आंब्रे यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे दीडशे ते दोनशे छोटे-मोठे कारखाने कार्यरत आहेत.या उद्योगांना एमआयडीसी कडून पाणीपुरवठा केला जातो.त्याचे योग्य ते शुल्क ही आकारण्यात येते आणि ते शुल्क उद्योजक वेळोवेळी भरत असतात.तरीही एमआयडीसी कडून कायमच अनियमित पाणीपुरवठा केला जातो.यातील बहुतांश कारखाने रासायनिक उत्पादने घेत असताना त्यांना पाण्याची अत्यंत गरज असते.अशावेळी अचानक पाणीपुरवठा खंडित झाल्यावर कारखान्यांचे लाखोंचे नुकसान होते. काही वेळा दुरुस्ती व देखभालीच्या नावाखाली एमआयडीसी कडून शटडाऊन घेतला जातो.त्या शटडाऊन बाबत कोणत्याही प्रकारे लेखी सूचना वा पूर्व कल्पना उद्योजक संघटनेला दिली जात नाही. केवळ व्हाट्सअप वरती एक मेसेज टाकला जातो. याही वेळी रविवार दिनांक ३० एप्रिल रोजी रात्री बारा वाजता पाणीपुरवठा खंडित झाला. तेव्हा 'दुरुस्ती व देखभालीसाठी २४ तासाचा शट डाऊन घेण्यात आला आहे,' असा व्हाट्सअप वरती मेसेज टाकण्यात आला. परंतु एमआयडीसीच्या डीसाळ नियोजनामुळे कोणतीही अद्ययावत यंत्रसामग्री नसलेल्या व अशा प्रकारचे जोखमीचे काम करण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या कंत्राटदाराला या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम देण्यात आले.परिणामी २४ तासांऐवजी हा शटडाऊन तब्बल सहा दिवस चालला.यामुळे औद्योगिक वसाहती मधील शेकडो कारखानदारांचे उत्पादन ठप्प झाले व कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले.याचबरोबर रासायनिक उद्योग आल्यामुळे पंचक्रोशीतील गावांमधील नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित व नष्ट झालेले आहेत. परिसरातील सर्व जनता व नोकरी व्यवसायासाठी आलेले परप्रांतीय सर्वजण एमआयडीसी कडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून असतात. अशावेळी या जनतेला कोणती पूर्वकल्पना नसताना तब्बल सहा दिवस पाणी न आल्यामुळे प्रचंड हाल सोसावे लागले.पंचक्रोशीतील बायका मुले पाण्याचे हंडे डोक्यावर घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत होते. या सर्व गोष्टीला केवळ एमआयडीसीचा ढिसाळ व नियोजन शून्य कारभार जबाबदार आहे आणि म्हणून येथील शेकडो का कारखानदार एमआयडीसी कडे नुकसान भरपाईची मागणी करणार असून त्याही पलीकडे जाऊन वेळ आल्यास सर्व उद्योजक आणि पंचक्रोशीतील नागरिक एमआयडीसीच्या ठिसाळ कारभाराच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष ॲड.राज आंब्रे यांनी दिला आहे.