४५४४ जागांसाठी तब्बल १३ लाख अर्ज, तलाठी परीक्षेतून सरकारच्या तिजोरीत १२७ कोटी जमा

 

मुंबई लोकनिर्माण टीम 

सरकारने काढलेल्या तलाठी भरतीत लाखो तरुण आपले नशीब आजमवायला निघाले आहेत. कारण ४६४४ जागांसाठी तब्बल १३ लाखांच्या जवळपास अर्ज दाखल झाले आहेत. या परीक्षा शुल्कापोटीच शासनाच्या तिजोरीत १२७ कोटी जमा झाले आहेत. महत्वाचे म्हणजे पीएचडी धारक, इंजिनिअर, एमबीए झालेले उच्चशिक्षित तरुणही तलाठी व्हायला निघालेत.

४ वर्षानंतर राज्यात तलाठी गट(क) भरतीला मुहूर्त लागलाय. सरकारने ४६४४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली. २६ जूनपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली. आज ज्यात २३ जुलै पर्यंत राज्यातील तब्बल १३ लाखांच्या जवळ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अजून दोन दिवस म्हणजेच २५ जुलै पर्यंत अर्ज भरण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकूण जागेच्या तुलनेत आलेल्या अर्जाचा विचार केला तर एका जागेसाठी २७५ उमेदवार आहेत. त्यामुळे प्रचंड स्पर्धा या परीक्षेसाठी निर्माण झालीय, याचे कारण म्हणजे मागच्या अनेक वर्षांपासून रखडलेली शासकीय भरती. म्हणूनच शासनाला ही परीक्षा २० पेक्षा अधिक दिवस घ्यावी लागणार आहे.

तलाठी पदासाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी १००० रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे.