वादळ आणि अवकाळी पावसामुळे ज्या-ज्या शेतक-यांचे नुकसान झाले आहे त्यापैकी एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही - ना. अब्दुल सत्तार

राजापूर /लोकनिर्माण (सुनील जठार)


      वादळ आणि अवकाळी पावसामुळे ज्या-ज्या शेतक-यांचे नुकसान झाले आहे त्यापैकी एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे महसुल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. कोकणातील जून्या  शासकीय इमारती, बंदरांमधील  साचलेला गाळ, खारजमीन बंधारे आदि प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटीबध्द् असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.    
राज्याचे महसुल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार कोकण दौ-यावर आले असता त्यांनी राजापूरात पत्रकारांशी संवाद साधला.  राजापूर दौ-यात आल्यानंतर  तहसील व लांजा तहसील कार्यालयाच्या इमारतीची पाहणी केली. त्या पार्श्वभूमीवर बोलताना पंचायत समिती, तहसील अशा शासकीय कार्यालयाच्या इमारती ब्रिटीशकालीन असून या कार्यालयांच्या नव्या इमारती उभारण्याच्या दृष्टीने मार्च मधील बजेटमध्ये निधीची तरतूद करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.  
खारजमीन बंधारे फुटून शेतामध्ये समुद्राचे पाणी शिरल्याने शेतक-यांचे  मोठे नुकसान होते. शिवाय बंदरांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने मच्छीमार व्यवसायिकांना अडचण निर्माण होते. हे प्रश्न सोडवितानाच परराज्यातील मच्छीमार कोकणातील समुद्रकिनारपट्टीवर येऊन मच्छीमारी करतात त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.         वाळू उपसा तसेच जांभा दगड उत्खननला असलेली बंदी उठविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यामुळे कोकणातील मोठी समस्या मार्गी लागणार आहे. तसेच घरबांधणी परवानगीचे अधिकारही ग्रामपंचायतींना देण्यात आल्याचे ना.सत्तार यांनी सांगितले. वादळ आणि अवकाळी पाऊस यामुळे येथील शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. शेतक-यांचे नुकसान भरपाई देण्यात येत असून एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.  
दरम्यान राजापूर शहर बाजारपेठ हे ब्रिटीशकालीन व्यापारी केंद्र म्हणून प्रसिध्द होते. मात्र शहरातून वाहणा-या  नद्यांना पावसाळ्यात सातत्याने येणा-या पुरामुळे बाजारपेठेला अवकळा आली आहे. त्यामुळे शहरातील अर्जुना व कोदवली नद्यांमधील गाळउपसा करतानाच या नद्यांना शहराकडील बाजूने संरक्षक भिंत बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना.सत्तार यांनी सांगितले.  


     
       कोरोना कालावधीत व माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियानात चांगले काम केल्याबद्दल तालुका प्रशासनाचे कौतुक केले. याबद्दल त्यांनी प्रातिनिधीक स्वरूपात प्रांताधिकारी प्रविण खाडे तसेच तहसीलदार सौ.प्रतिभा वराळे ,लांजा तहसीलदार श्री पोपट ओमासे यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी,जिल्हापरिषद अध्यक्ष रोहन बने ,शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके,उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर, संदीप दळवी,सभापती प्रकाश गुरव,लीला घडशी,शहर प्रमुख संजय पवार,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष जिल्हापरिषद सदस्य  आबा आडीवरेकर,जिल्हापरिषद सदस्य दीपक नागले,सोनम बावकर,भारती सरवनकर,उपतालुका प्रमुख तात्या सरवनकर,राजन कुवळेकर,विभाग प्रमुख संतोष हातनकर, नरेश दुधवडकर, कमलाकर कदम,उमेश पराडकर,माजी सभापती शरद लिगायत ,गणेश पांचाळ,माजी नगरसेवक अभय मेळेकर,पांड्या काझी,गटविकास अधिकारी सागर पाटील, मा.उपविभागीय अधिकारी अव्वल कारकून श्रीमती दिपाली पंडित सर्व विभाग चे कर्मचारी ,लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी उपस्थित होते.