लोटे लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये लोटे या ठिकाणी असणाऱ्या बहुचर्चित गोशाळेमध्ये एक महिन्यापासून १८ गायींचा मृत्यू झाला आहे.गोशाळेचे संचालक व कीर्तनकार भगवान कोकरे महाराज हे उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. मात्र या चार दिवसांमध्ये सहा गाईंचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी देखील चार गाईंचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या गोशाळेमध्ये १००० गाई आहेत मात्र शासनाने अनुदान न दिल्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून कोकरे महाराज हे उपोषणाला बसले आहेत. मात्र दुसरीकडे शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून या गोशाळेबाबत विविध आक्षेप घेण्यात आले आहेत. त्या संधार्भात त्यांना शासनाकडून नोटीस देखील देण्यात आली आहे. सर्व पार्श्वभूमीवर या संस्थेचे संचालक भगवान कोकरे महाराज हे उपोषणाला बसले. मात्र या गोशाळेतील गाईंचा जाणारा जीव आणि त्यांचे होणारे हाल याला नेमकं कोण जबाबदार असा सवाल उपस्थित केला जात आहे. शासन की गोशाळेचे संचालक असा प्रश्न आता निर्माण झालाय. काहीही असलं तरी हजारो गाईंच्या आरोग्याचा आणि जीवित याचा प्रश्न निर्माण झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
२००८ साली कसायाकडे जाणाऱ्या गाईंना वाचवण्यासाठी तसेच महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या गाईंना आसरा देण्यासाठी एका आश्रमाची स्थापना करण्यात आली. गाईंची सेवा करण्यासाठी जेष्ठ कीर्तनकार भगवान कोकरे महाराज यांनी संत ज्ञानेश्वर माउली जीवन मुक्ती धाम सेवा संस्था स्थापन केली. त्याठिकाणी जिल्ह्यातली पहिली मोठी गो शाळा स्थापन केली.
२०१७ मध्ये या गोशाळेसाठी महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्राकडून १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यापैकी ७५ लाख रुपये दिले गेले त्यातून या संस्थेने गो शाळेसाठी आवश्यक बांधकामे केली. मात्र गेल्या चारवर्षांपासून मंजूर निधी पैकी उर्वरित असेलेले २५ लाख शासनाकडून प्राप्त झालेले नाहीत यातच काही ग्रामस्थांनी या गोशाळेला विरोध सुरू केला असून प्रशासनाकडूनही गोशाळेला नोटीस देण्यात आले आहे.