राजापूर / लोकनिर्माण (सुनील जठार)
ग्रामीण भागात रोजगाराला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ घेवून तरूणांनी आर्थिक सक्षम व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी शलेंद्र कोलथरकर यांनी राजापूर येथे केले.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ तसेच जिल्हा उद्योग केंद्र, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जगजागृती मेळाव्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. राजापूर नगरवाचनालयाच्या सभागृहात आयोजित या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून राजापूर तालुका औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सह.संस्थेचे अध्यक्ष सुनिल जठार, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक हरीभाऊ आंधळे, तालुका कृषि अधिकारी विद्या पाटील, शेजवली सरपंच मंदार राणे, सचिव तथा जेष्ठ लेखापाल, रत्नागिरी आनंद चौधरी, प्रगतशील मधपाळ मिलींद गाडगीळ, औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सह.संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. प्रतिक्षा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गुहागर येथील प्रगतशिल मधपाळ श्री.गाडगीळ यांनी मधुमक्षिका पालन व्यवसायाबाबत विस्तृत माहिती दिली. अत्यंत कमी गुंतवणूक आणि कमी श्रमामध्ये मधुमक्षिका पालन व्यवसाय करता येतो, शिवाय मधुमक्षिका पालनामुळे कोकणातील आंबा, काजू, नारळ, सुपारी यासह अन्य पिकांचे उत्पादन वाढण्यासही मदत होत असल्याचे श्री.गाडगीळ यांनी सांगितले. तसेच कृषि अधिकारी श्रीम.पाटील यांनी कृषि विषयक योजना तर श्री.आंधळे यांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनांविषयी माहिती दिली. यावेळी श्री.चौधरी यांनीही मार्गदर्शन केले.
या कार्यकमाला राजापूर तालुका औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सह.संस्थेचे संचालक सुघोष काळे, विवेक गुरव यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.जठार यांनी तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश नाचणेकर यांनी केले.