आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार; त्यानिमित्ताने कोकणातील श्रीक्षेत्र मार्लेश्वर या जागृत देवस्थानाविषयी थोडक्यात माहीती 

 



(कोविड-१९ मुळे भक्त श्रावण महिण्यातही मार्लेश्वर दर्शनापासून दूर.. ! कोरोनाचे सावट



मुंबई/लोकनिर्माण(शांत्ताराम गुडेकर )


[ महाराष्ट्राचं वैभव असलेल्या सह्याद्री पर्वतरांगांमधील एका कडेकपारीतील एका शिखरावर भगवान शंकरांचं श्री मार्लेश्वर हे देवस्थान वसलेले आहे. वनश्रीने नटलेला सह्याद्री म्हणजेच निसर्गाचा अविष्कारच! त्यातच मार्लेश्वर म्हणजे नागमोडी पर्वतरांगा जणू निसर्ग सागरावर उमटणा-या सोनेरी लाटाच! या निर्जन, निरव शांतता असलेल्या अरण्यात अध्यात्मिक उपासकांसाठी अभंग शांतता भरून राहिली आहे. श्री क्षेत्र मार्लेश्वर म्हणजे योग साधकास अध्यात्मिक साधनेसाठी एक उत्कृष्ट तपोवनच आहे.]


           


           संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून सुमारे १५ कि. मी.आणि आंगवली या गावापासून ११ कि. मी. अंतरावर अतिशय दुर्गम ठिकाणी असलेलं हे पवित्रआणि जागृत  देवस्थान अत्यंत प्राचीन आहे. नैसर्गिक दृष्टय़ा अतिशय विलोभनिय असणा-या या ठिकाणी माणूस अक्षरश: हरवून जातो. भोवतालच्या रमणीय परिसराचा व हिरव्यागार वनश्रीचा आस्वाद घेण्यात दंग होतो. उंच उंच कडेकपारी पर्वतांमधूनच वाहणारी ‘बावनदी’ त्यामध्ये बारमाही ओतणारा ‘धारेश्वर’ धबधबा. तसेच लतावेलींची सोबत आणि पक्ष्यांचे कुंजन प्रसन्नतेला वरदान आहे. पावसाळ्यात किंवा पावसाळा संपता संपता श्री क्षेत्र मार्लेश्वरला भेट देण्याची मजा आणखीनच वेगळी असते.
      श्री क्षेत्र मार्लेश्वर बसस्थानकापासून पुढे अरुंद नागमोडी सिमेंटच्या पाय-यांची पक्की पायवाट आहे. घनदाट जंगल, खाली खोल दरी, माथ्यावर सह्याद्रीची शिखरं पाहत असताना अनोख्या विश्वात कधी पोहचतो, याचे भानच राहत नाही. देवळाचा साडेतीन फुटी दरवाजा व गाभारा गुहास्वरूपाचा असून तो सुरक्षित आहे. एकावेळी एकच व्यक्ती आत जाऊ शकते किंवा बाहेर येऊ शकते. गाभा-यात मात्र २५ माणसं उभी राहू शकतात. ही गुहा पांडवकालीन असल्याचे जनमत आहे. गाभा-यात शंकराची स्वयंभू पिंड आहे. सोबत पाण्याचे कुंड असून खोळवर गेलेली विवरं आहेत. याठिकाणी विविध प्रकारचे साप व नाग मुक्तपणे संचार करताना दिसतात.
मात्र ते कोणालाही इजा करत नाहीत. वाटेत वानरांची खोडकर वानरसेना हसत खिदळत मन रिझवतात. या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखण्यासाठी महाराष्ट्र शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वयंसेवी संस्था, सामाजिक सांस्था, पत्रकार, स्वयंसेवक श्री क्षेत्र मार्लेश्वर ट्रस्ट, मारळ ग्रामपंचायत व अन्य समिती पदाधिकारी, सदस्य, पोलिस यंत्रणा प्रयत्न करत असतात. येणा-या-जाणा-या भाविकांना त्रास होऊ नये, म्हणून दक्षता घेतली जाते. शिवाय स्वच्छता राखण्याचे कामही चोख बजावले जाते. अनेक सुखसोई उपलब्ध करून देण्यासाठी समितीतर्फे कार्यकर्ता झटत असतात.मार्लेश्वरचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी याठिकाणी र्वषभर रिघ असते. शालेय सहली याचठिकाणी मोठय़ा प्रमाणात येत असतात. दर महिन्याच्या सोमवार व शनिवार तसंच सुट्टीच्या दिवशी व श्रावण महिन्यात, महाशिवरात्री, दत्तजयंती या दिवशी तर भाविकांचा महासागर लोटतो. जानेवारी महिन्यात तर येथे खूपच गर्दी असते. कोकणवासीय चाकरमान्यांचे श्रद्धास्थान असलेल्या मार्लेश्वरचा जत्रौत्सव असतो. १३ व १८ जानेवारी दरम्यान होणा-या या जत्रोत्सवाला लाखो भाविक हजेरी लावतात. पूर्वी मारळ,आंगवली या गावांना फारसं कोणी ओळखत नव्हतं. परंतु आज मारळ-आंगवली म्हणजे मार्लेश्वर व मार्लेश्वर म्हणजे आंगवली-मारळ होय.या यात्रेसाठी भाविक पायी, सायकल व इतर खाजगी वाहने, एस.टी. बसेसने येत असतात. मुंबई येथून अनेक भाविक ग्रुपने बस करून यात्रेसाठी जातात. परळ, कुर्ला, मुंबई सेंट्रल, ठाणे, बोरिवली याठिकाणाहून तसेच कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, साखरपा, देवरूख, संगमेश्वर, सावंतवाडी याठिकाणाहून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे एस.टी.ची सोय केलेली असते.
          मारळ-आंगवली मध्ये या काळात दिवाळी साजरी होत असते. अंगणात रांगोळी, दरवाजावर तोरण, रंगरंगोटीही करून येणा-या-जाणा-या भाविकांचे, नातेवाईक यांचे स्वागतच केले जाते. हजारो गाडय़ा ये-जा करत असतात. सारा परिसर ‘हर हर महादेवऽऽऽ..’, ‘हर हर मार्लेश्वरऽऽऽ..’ या जयघोषाने दुमदुमत असतो. आंगवली गावांमध्ये असणारे मार्लेश्वर  देवालय (मठ- सद्यस्थितीत जीर्णोद्धार सुरु आहे )व मारळचे श्री क्षेत्र मार्लेश्वर  देवस्थानचे पावित्र्य जपणे प्रत्येकाच्या हाती असते.कारण ही दोन्ही मंदिरे वैशिष्टय़पूर्ण आहेत. याठिकाणी येणारे भाविक मद्यपान करून येऊ शकत नाहीत. शिवाय मांसाहार केलेलाही चालत नाही. महिलांनी आपल्या अडचणीत याठिकाणी येऊ नये असा संकेत आहे. ज्यांनी या बाबींचा विचार केला नाही, त्या-त्या वेळी नसíगक आपत्ती वा अपघात झाले असल्याचे येथील ज्येष्ठ नागरिकांकडून सांगितले जाते.
     येथील धारेश्वर धबधब्याखाली प्रत्येक भाविक (पुरुष-महिला, युवकवर्ग) एकत्रितपणे स्नान करून शुचिर्भुत होऊनच मार्लेश्वरचे दर्शन घेतात.मात्र पावसाळ्यात धारेश्वर धबधव्याखाली जायला सक्त मनाई आहे.येथे स्नान करणे हा एक अनोखा आनंदच! वर्षासहलीसाठीही येथे दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात.आपणही एक वेळ येथील जत्रौत्सवाचा किंवा मार्लेश्वर तीर्थक्षेत्राचा अनुभव घ्यावा. येथील निसर्ग सौंदर्य, धारेश्वर धबधबा आपणास येथे पुन्हा पुन्हा येण्यास उद्युक्त करते. कारण हे मार्लेश्वर  देवालय (मठ) व श्री क्षेत्र मार्लेश्वर  तीर्थस्थान ग्रामदैवत तितक्याच निसर्गरम्य गावात वासलेले असून मनाला ओढ लावणारे, स्मृतिचिरंतन करणारे, गतकाळाला उजाळा देणारे नव्हे तर पुन्हा-पुन्हा पाहातच राहावे असेच आहे. एकवेळ आपणही आमच्या या श्री क्षेत्र मार्लेश्वरला अवश्य भेट देऊन आनंद लुटावा.(मात्र कोविड -१९ मुळे यावर्षी दर्शन बंदी आहे.पुढील वर्षी नक्की आनंद घ्यावा ही विनंती. 
‘हर हर महादेवऽऽऽ..!!’ ‘
हर हर मार्लेश्वरऽऽऽ..!!’